Tuesday, 27 August 2013


व्यक्तिमत्त्व विकास

आपल्या अनुवंशिकतेने आणि आजूबाजूच्या वातावरणाने, अनुभवाने आपली जी जडणघडण होते ते म्हणजे व्यक्तिमत्व. पण बहुतांश वेळा आपल्या जडणघडणीचा आणि आलेल्या अनुभवांचा व्यक्तिमत्व साकार होण्यास जास्त हातभार असतो.
प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या वेगळेपणातच त्याची मजा आहे. प्रत्येक व्यक्तीमत्वात त्याच्या उणीवा आणि बलस्थाने पण असतात कारण कोणीही एक व्यक्ती म्हणून परिपूर्ण नाही. असे असले तरी आपण व्यक्तिमत्व विकास केंद्रांच्या मदतीने परीपूर्णतेकडे वाटचाल नक्कीच करू शकतो.
व्यक्तिमत्व विकास ह्या विविध पातळ्यांवर साधला जातो.                        
१ शारीरिक पातळी – देहबोली 
२ मानसिक पातळी- ताण तणाव सहन करण्याची क्षमता
३ सामाजिक पातळी- सामाजिक समस्या समजून त्या सोडवण्याची क्षमता.
व्यक्तिमत्व विकास केंद्रात आपल्या उणीवांवर काम करण्याची संधी मिळते. उदा. काही व्यक्तींना स्टेजवर उभे राहून बोलण्याची भीती वाटते.अशावेळी व्यक्तिमत्व विकास केंद्रात ह्याबाबत प्रयत्न केले जातात.
शारीरिक पातळी - काही क्षेत्रात पेहरावही त्यांच्या नोकरीचा महत्वाचा भाग असतो.  बहुतांश वेळा कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत हे काळात नाही अशावेळी कोणत्या प्रकारचा पेहराव कधी घालावा ह्या संबंधी सुद्धा व्यक्तिमत्व विकास केंद्रात मदत मिळते
मानसिक पातळी – स्वताच्या विचारांवर आपला व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो. त्यामुळे सकारात्मक विचार , स्वताला आपल्यात असलेल्या गुण दोषांसकट स्वीकारणे महत्वाचे ठरते.
सामाजिक पातळी – काही जणांचे काम हे लोकांसोबतच असते. उदा. एखादा समाजसेवक. आणि कधी कधी एखाद्या समस्येला समजून घेण्यात त्यांना अडचणी येतात अशावेळी सामाजिक पातळीवरच्या व्यक्तिमत्व विकासाची गरज असते.
अशाप्रकारच्या विविध गोष्टींवर व्यक्तिमत्व विकास केंद्रात मदत मिळते. व्यक्तिमत्व विकास खाजगी कंपन्यांमध्ये उपयोगी पडणारी कौशल्ये सुद्धा शिकवली जातात .
व्यक्तिमत्व विकास केंद्राचा  मनीषाला झालेला फायदा पाहूया.
मनीषा एका स्वयंसेवी संस्थेत नुकतीच कामाला रुजू झाली होती. त्यामुळे तिला तिथे जरा एकट वाटायच. ती कुणाशी फार बोलायची नाही कुणात फार मिसळायची नाही. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिच्या कामावर परिणाम होऊ लागला. अशावेळी तिने व्यक्तिमत्व विकास केंद्रात जायचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर तिला तिच्या स्वताच्या मानसिकतेवर परत विचार करता आला. कामाच्या ठिकाणच्या समस्यांच निरसन करता आल. त्यानंतर ती स्वताहून सर्वांमध्ये मिसळू लागली आणि तिच्या कामाचा दर्जाही सुधारला.
अशा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्तिमत्व विकास केंद्रांची मदत होते. 
व्यक्तिमत्त्व विकासाचे फार विकृत पैलू सध्या दिसायला लागलेत. समोरच्या माणसावर आपली छाप पडणं, कोणत्याही प्रश्नाला न बिचकता चटपटीत उत्तर देता येणं, अस्खलित (?) इंग्लिश बोलता येणं, कुठेही बुजायला न होणं, कोणत्याही मर्यादा (inhibitions) नसणं म्हणजे चांगलं व्यक्तिमत्त्व अशी समजूत होते आहे. स्वतःकडे पाहायचं ते इतरांच्याच डोळ्यांनी! त्यांना आपण कसे दिसतो ते महत्त्वाचं. आपलं आपण कधी आपल्या आत डोकावून पाहायचंच नाही. हे कुठलं शिक्षण आहे? का हा दिखाऊपणा, उथळपणा मुलांच्या माथी मारायचा?
विकासाच्या नावाखाली आपण मुलांना ‘‘असामान्य’’ करायच्या मागे आहोत. ही आपली लाडकी मुलं, देशाचे भावी आधारस्तंभ, ही विकसित व्यक्तिमत्त्वं मोठी होऊन नेमकं काय करणार आहेत?
डॉक्टर होऊन सामान्य माणसाच्या खिशातला पैसा उपसून बंगले उभारणार आहेत? बिल्डर होऊन सामान्य माणसाला रडवणार आहेत? वकील-न्यायाधीश होऊन सामान्य माणसाची फरपट करणार आहेत? राजकारणी होऊनही सामान्य माणसाच्या नरडीवर पाय देणार आहेत? अभ्यासक, संशोधक होऊन परदेशात स्थायिक होऊन स्वतःच्याच माय मातीवर थुंकणार आहेत?
ज्या मुलांना शाळेत बुटाला पॉलिश नसलं तर शिक्षा होते; स्वच्छ इस्त्रीचे कपडे नसले तर दंड होतो, ती मुलं जेव्हा पायात न घालणार्या - अनवाणी धूळ भरल्या पायांना भेटतील, अंगावरच्या फाटक्या चिरगुटांना पाहतील तेव्हा त्यांना त्या मागची माणसं दिसणार आहेत?
आपण कोणते डोळे त्या मुलांना देतो आहोत? कसलं मन देतो आहोत? चैन-उपभोग-मौज-स्वार्थ यांनी भरलेलं बालपण त्यांना मिळालं तर ती चांगली माणसं होणार तरी कशी?
आणि ही आपापल्या पोटची पोरं वरवर जावीत अशा महत्त्वाकांक्षा बाळगणारी पालकांची आतडी ज्यांना पालकच नाहीत अशा मुलांसाठी कधी तुटणारच नाहीत का? आपल्या मुलासाठी शंभर रुपये पाकिटातून निघतात तेव्हा त्यातले पाच दहा इतर गरीब मुलांसाठी खर्च करायची बुद्धी पालकांना कधी होणारच नाही का? आणि ही जाणीव पालकांना नसली तर ती मुलांमधे येणार कुठून?
ज्या देशाशी, ज्या इतिहासाशी, ज्या थोर माणसांशी आपली नाळ जोडलेली आहे त्यांच्यातलं काय सत्त्व आज आपल्या जगण्यात उरलंय? गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगातला एक तरी आपल्या वागण्यात डोकावतो? आगरकर फुल्यांचे आपण वारस कोणत्या समाज सुधारणेचा ध्यास घेतो? कृष्णमूर्तींना महान मानणारे आपण आपल्या रोजच्या जीवनात कोणती साधना करतो?
व्यक्तिमत्त्वविकासाच्या दिखाऊ, पाश्चात्य, शहरी, निरुपयोगी फॅडांपासून पालकांनी दूर राहायला हवं. ही पैशांनी विकत घेता येणारी गोष्ट नाही. त्यासाठी आतूनच मूल विकसित व्हायला हवं. त्याला त्याच्या त्या त्या वयातल्या जबाबदार्यांची जाणीव हवी. देशातल्या गरिबांचा मनापासून कळवळा हवा. काही थेरं नाकारण्याची ताकद हवी. त्यासाठी स्वतंत्र विचार हवा, विशाल मन हवं.
असा विकास घडायचा तर पालकांना आणि शिक्षकांना, राजकारण्यांना आणि समाजधुरीणांना सर्वांनाच आपण काय करतो आहोत, कसे वागत आहोत याचं भान हवं. मुलं शिबिरातून शिकतात त्यापेक्षा कितीतरी पटीनं त्या माणसांकडून नकळत शिकतात. तेव्हा व्यक्तिमत्त्वविकास हा शब्द पोरांच्या पाठीमागे लावून देण्याआधी स्वतःच्या मनात पेरण्याची जबाबदारी मोठ्या माणसांची आहे.

Saturday, 24 August 2013



     ९९९ चा विश्वचषक सुरु व्हायला दोन-तीनच दिवस बाकी होते.आम्ही तेंव्हा देवळाली कॅम्प च्या सैनिकी वसाहतीत राहायचो.आई-बाबांचा आणि क्रिकेट चा तर दूरदूरवरचा संबंध नव्हता,लहान भाऊ खुपच लहान असल्याने त्याच्या आवडीचा प्रश्नच येत नव्हता,मलाही क्रिकेट मध्ये फार रस नव्हता,पाहायला तर मुळीच आवडत नसे पण कधी-कधी गल्लीत मित्रांबरोबर खेळायचो ते हि काहीच करायला नसेल तरच!. थोडक्यात आमच्या घरात कुणालाही क्रिकेटविषयी थोडीही आपुलकी नव्हती.त्याच कालावधीत माझा आवडता आते-भाऊ जो एक क्रिकेट-प्रेमीही आहे त्याच्या १०वी च्या परीक्षा उरकून काही दिवस आमच्याकडे राहायला आला होता.माझे सर्वात लहान काका रेल्वेमध्ये नौकरी करतात त्यांची बदली त्यावेळेला ‘मनमाड’ ला होती,त्यांनाही विश्वचषकाच्या ज्वराने झपाटले होते,त्याचा आनंद लुटता यावा म्हणून त्यांनी मनमाड-देवळाली कॅम्प ‘अप-डाऊन’ करायचे ठरवले.मग काय,काका त्यांची रात्री-बेरात्रीची नौकरी करून यायचे आणि त्यावेळेस फक्त सात-आठ वाहिन्याच दिसायच्या मग हे दोघे ‘मामा-भांजे’ मी सकाळी उठायच्या अगोदरपासूनच ‘टीव्हीचा’ ‘रिमोट’ घेऊन बसायचे आणि जणू काही सामन्यापुर्वीचा सराव करताय असे क्रिकेटविषयी जे काही मिळेल ते पाहत बसायचे.मला मात्र त्यांचे ते आवडायचे नाही कारण आमच्याकडे टीव्ही काही महिन्यांपूर्वीच आला होता,सकाळी उठल्या-उठल्या मला ‘कार्टून्स’ पाहायची सवय लागली होती ते त्यांच्यामुळे बघायला मिळत नसे.लहानपणापासूनच काकांची भीती वाटत असल्याने त्यांच्याकडे कधीच ‘रिमोट’ मागायची हिम्मत झाली नाही.पण कधी-कधी काका नसले कि मी त्या दादाला म्हणायचो ‘मी तुम्हाला फक्त ‘इंडियाचीच’ म्याच बघू देईल बर का!’ आणि तो मला लगेच काकांचा धाक घालायचा,त्यामुळे तो माझा आवडता भाऊ काही दिवसांतच नावडता झाला होता.मग काय थोडावेळ बाहेर काहीतरी खेळून यायचे आणि घरात कुठेतरी एका कोपऱ्यात त्यांच्या गप्पा ऐकत बसायचे कारण क्रिकेट कळायचे नाही.
     मी बाहेर माझ्या मित्रांमध्ये खेळायला जायचो तेंव्हा ते पण क्रिकेटविषयीच बोलायचे,खासकरून अधून-मधून ‘अरे इंडिया के पास सचिन है  यार’,’लेकिन सचिन आउट हो जाने के बाद इंडिया हार जाती है’,’यार काश इंडिया-पाकिस्तान कि टीम मिलजाये तो हमे कोईभी नही हारा पायेगा’,असे ‘डायलॉग’ मारायचे.त्यामुळे मला त्यांच्या संभाषणात सहभागी होता यायचे नाही कारण क्रिकेट बद्दल खुपच कमी माहिती असल्यामुळे शब्द कमी पडायचे.मग मी हि ठरवले कि आपणहि क्रिकेट पाहूया,श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात १४ मे ला विश्वचषकाचा पहिला सामना पाहण्यासाठी मामा-भांजे आणि कधी भारताचाच सामना न पाहिलेला मी तो सामना पाहण्यासाठी सज्ज झालो.एखाद्या फलंदाजाने चौकार मारला किंवा एखादा बाद झाला कि ते मामा-भांजे लगेच टाळ्या पिटायचे,त्यांनी पिटली कि मग,मी हि पिटायचो!.दादाला विचारले ‘कोण जिंकेल?’,तो म्हटला ‘श्रीलंका’.थोडावेळ बसलो आणि खूप कंटाळा आला कधी झोपलो मलाच कळले नाही.सकाळी उठलो आणि दादाला विचारले ‘श्रीलंका जिंकली ना काल?’

दादा-“नाही,इंग्लंड जिंकली”,

मी-“अरे पण तू बोलला होता ना,कि श्रीलंका जिंकेल म्हणून’

दादा-“अरे ते दोन्हीहि संघ चांगले होते,मला वाटत होते कि श्रीलंका जिंकेल म्हणून...,पण नाही जिंकली,इंग्लंड ची टीम चांगली खेळली,कालचे सोड रे!, आज बघ! ,भारताचा सामना आहे आज ‘दक्षिण आफ्रिकेबरोबर’,सचिन बघ कसा मारेल एकेकाला”.

     मला प्रश्न पडायचा,क्रिकेट म्हटले कि सचिनचेच नाव का येते? चौथीच्या वर्गातही बाईंनी ‘माझा आवडता खेळ-क्रिकेट’ निबंध लिहून देताना सचिनचाच उल्लेख केला होता.’क्रिकेट फिवर’ असल्याने बाहेर मित्रपण सचिनचेच गुणगान गात असतात आणि दादापण सचिनकडूनच अपेक्षा ठेऊन बसला आहे.त्याचे नाव तर मी खूपवेळा ऐकले होते पण त्याला टीव्हीवर खेळतांना कधीच पहिले नव्हते तेंव्हा ठरवले नेमके सचिन मैदानावर अशी काय जादू करतो? ते आज पाहुयाच.
     दुपारचे जेवण करून आम्ही सगळे टीव्हीसमोर बसलो.प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सचिन-गांगुली फलंदाजी करण्यासाठी आले.मी दादाला विचारले “खरच सचिन खूप ‘सिक्स’ मारतो का रे?” तो म्हटला ‘तू फक्त बघ!,कळेल तुला’. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर गांगुलीने एक खणखणीत असा फटका मारला आणि टीव्हीवरील प्रेक्षकांबरोबरच मामा-भांजे यांनीही गोंगाट केला.दुसऱ्या षटकात सचिन खेळायला आला,माझे आख्खे लक्ष त्याच्याकडे होते.गोलंदाजाने चेडू फेकला आणि सचिनने तो सोडून दिला.मी लगेच दादाकडे पाहिले आणि मी काही म्हणायच्या आतच तो म्हणाला ‘मारेल,मारेल...थांब!,पहिलाच बॉल होता’.त्याच्यापुढचा चेंडू मात्र सचिनने मारला पण एकहि धाव मिळाली नाही.पुढच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मात्र सचिनने एक सुरेख फटका मारला आणि चौकार गेला आणि टीव्हीवर बोलणारा माणूस जोरजोराने ओरडायला लागला,आणि त्या आवाजात मामा-भांजे,माझी आणि शेजाऱ्यापाजार्यांच्या गोंगाटाची भर पडली.त्याच षटकात सचिनने अजून एक चौकार मारला.मला जास्त काही कळत नव्हते पण ज्या तऱ्हेने ते दोघे फटके मारत होते ते पाहून फार आनंद होत होता.जसजसा सामना पुढे सरकत होता तसतसे ते धावांचा पाऊस पाडतच होते पण त्यातच १५ व्या षटकात सचिन बाद झाला आणि तो टीव्हीवरील माणूस सोडून आम्ही सगळेच शोकात विलीन झालो.पुढे सौरव गांगुलीने काही प्रमाणात खिंड लढवण्याचा प्रयत्न केला पण दक्षिण आफ्रिकेचा संघ त्या सामन्यात सरस ठरला.
     तो विश्वचषक संपेपर्यंत तर मला आख्खे क्रिकेट कळायला लागले होते (निदान मला तरी तसे वाटत होते),त्या विश्वचषकामुळेच मी या खेळाच्या प्रेमात पडलो आणि आता तो माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे.आजही सचिन जेंव्हा फलंदाजीला येतो मी त्याच उत्साहाने टीव्हीसमोर बसतो आणि त्या जादुगाराच्या जादूत हरवून जातो.प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वयोमानानुसार काही शारीरिक मर्यादा येतात तशा त्याच्या खेळातहि मर्यादा आल्या आहेतच! तरीही तो त्याच्या पूर्ण शक्तीनिशी या करोडो चाहत्यांच्या अपेक्षांचे ओझे वाहण्याचा प्रयत्न करतोय हे पाहून तर त्याच्याविषयीचा आदर अजूनच वाढतो.


Thursday, 15 August 2013

क्रिडांगणाविषयी माहिती

 कबड्डी मैदाने :                                                             

कबड्डी खेळासाठी लागणारे क्रीडांगनांची ३ गटात वर्गवारी केली जाते. पुरूष व कुमार गटाच्या मुलांसाठी १३.०० मी. बाय १०.०० मी. , महिला व कुमारी गटाच्या मुलींसाठी १२.०० मी. बाय ८.०० मी. तसेच किशोर व किशोरी गटाच्या मुलामुलींसाठी ११.०० मी. बाय ८.०० मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवताना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे.
क्रिडांगणाविषयी माहिती :
अ) पुरुष व कुमार गट मुले यांच्यासाठी
1. क्रिडांगणाची रुंदी 10 मी. व लांबी 13 मी. असते.
2. मध्यरेषा 6.50 मीटरवर असते.
3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. असते.
4. निदानरेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3.50 मीटर अंतरावर असते.
5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
6. सिटींग बॉक्स 8 मी ु 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.
ब) महिला व कुमारी मुली यांच्यासाठी
1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 12 मी. असते.
2. मध्यरेषा 6 मीटरवर असते.
3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.
4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 3 मीटर अंतरावर असते.
5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
6. सिटींग बॉक्स 6 मी. ु 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.
) किशोर मुले व किशोरी मुली यांच्यासाठी
1. क्रिडांगणाची रुंदी 8 मी. व लांबी 11 मी. असते.
2. मध्यरेषा 5.50 मीटरवर असते.
3. राखीव क्षेत्र क्रिडांगणाच्या दोन्ही बाजूस 1 मी. वर असते.
4. निदान रेषा क्रिडांगणाच्या मध्यरेषेपासून 2.50 मीटर अंतरावर असते.
5. निदान रेषेपासून 1 मी. अंतरावर अंतिम रेषेच्या बाजूस एक रेषा बोनस रेषा म्हणून आखली जाईल.
6. सिटींग बॉक्स 4 मी. ु 1 मी. असून तो अंतिम रेषेपासून 2 मीटरवर असते.

knowlege of sports